नवी मुंबई, दि. १ : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा केवळ ८.८४ टक्क्यांवर आला असून, नागरिकांनी तातडीने पाण्याचा काटकसरीने वापर करून अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरणातील जलसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
अनावश्यक पाणी वापर टाळणे, गळती त्वरित दुरुस्त करणे, वाहन धुण्यासाठी पाईपचा वापर टाळणे, शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखणे, अशा उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“एक जबाबदार नागरिक बना, पाणी वाचवा आणि भविष्यासाठी जलसुरक्षा सुनिश्चित करा,” असा संदेशही प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.