लातूरमध्ये काँग्रेसचा ४७ जागांवर विजय
भाजपच्या जोरदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवरही लातूरमध्ये काँग्रेसने वेगळे चित्र उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने काँग्रेसने लातूर महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकावत ४७ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालातून लातूरकरांनी लोकनेते विलासराव देशमुख यांचा वारसा अद्याप विसरलेला नाही, हे अधोरेखित झाले असून, काँग्रेसने येथे भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
राज्यात १५ जानेवारी रोजी झालेल्या २९ महापालिकांसाठीच्या मतदानात सरासरी सुमारे ६० टक्के मतदान नोंदवले गेले. तीव्र राजकीय आरोप-प्रत्यारोप, बदलत्या युती-आघाड्या आणि जोरदार प्रचारामुळे चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत एकूण १५ हजार ९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, त्याचा निकाल आता राज्यातील स्थानिक राजकारणाची नवी दिशा ठरवणारा ठरत आहे.


