सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर - नितेश राणे.
वाढदिवस साजरा न करण्याचा नितेश राणे यांचा निर्णय; समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन
मुंबई/सिंधुदुर्ग : कोकणातील आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांवर आलेले संकट तसेच राज्यभर एल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, आपला २३ जून रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
सध्याच्या कठीण परिस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा जनतेच्या समस्या आणि संकटांचे भान राखणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आपल्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन केले.
त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’, गौसंवर्धन, गरजूंना मदत तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. हिंदुत्वाच्या संस्कारातून समाजसेवा आणि जनकल्याणाचे कार्य हेच खऱ्या अर्थाने उत्सव साजरा करण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यकर्त्यांनी दाखविलेला सेवाभाव आणि समाजहितासाठी केलेले कार्य हीच आपल्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट आणि सदिच्छा असेल, अशी भावना नितेश राणे यांनी व्यक्त केली.