सुशासन सप्ताह कार्यशाळा संपन्न
जलद व पारदर्शक सेवा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सिंधुदुर्ग l

जनतेची कामे जलद, पारदर्शक आणि प्रभावीपणे पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. लोकाभिमुख प्रशासन, जलद सेवा वितरण आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुशासन सप्ताह अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे होत्या.
कार्यशाळेत अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वराळे, आरती देसाई, सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी (वक्ते) श्री वळंजू तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा वेळेत, पारदर्शकतेने आणि परिणामकारकतेने पोहोचल्या पाहिजेत. प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास टिकवणे हे आपल्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर वेळेत निर्णय घेणे हेच खरे सुशासन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करताना कालमर्यादा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी श्री वळंजू यांनी सुशासन संकल्पनेवर मार्गदर्शन करताना सांगितले की, फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरून निर्णयात होणारा विलंब सामान्य नागरिकांनाही त्रासदायक ठरतो. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न विहित कालावधीत निकाली काढणे किंवा पुढील टप्प्यावर नेणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याची जाणीव प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने ठेवावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी श्रीमती वराळे यांनी केले, तर सूत्रसंचलन श्रीमती राजश्री सामंत यांनी केले.


