स्मशानभूमी व रस्त्यासाठी नेरूर-वाघचौडी शेतकऱ्यांचे १ मे रोजी उपोषणाचा इशारा
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडी वाडी येथील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनी कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. स्मशानभूमी व ओएस-९ बॉर्डर रस्त्याची मागणी पूर्ण न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे २५ वर्षांपूर्वी केवळ ३५ रुपये प्रति गुंठा दराने जमीन देऊनही प्रशासनाकडून दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. सध्या असलेली स्मशानभूमी झाडीझुडपांनी व्यापलेली असल्याने अंत्यविधी करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे डी-३९ भूखंडातील ३ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी तसेच जोडरस्त्याची तातडीने आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
गेल्या ५-६ वर्षांत प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिन अशा विविध प्रसंगी शेतकऱ्यांनी वारंवार उपोषणे केली; मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनी क्षेत्र व्यवस्थापकांचे पत्र मिळूनही तीन महिने उलटून गेले तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणे यांच्या २६ जानेवारीच्या पत्रालाही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास संबंधित भूखंडावर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी श्याम गावडे व अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.


