शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केल्याशिवाय मिळणार नाही योजनेचा लाभ
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. मात्र, वसतिगृहासाठी अर्ज न करणारे विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असा इशारा समाज कल्याण विभागाने दिला आहे.
मागील परीक्षेत किमान ५० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमासाठी अर्जाची अंतिम तारीख ३० जून तर इयत्ता ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.