नवी दिल्ली : विमान प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हवाई तिकिटांच्या परतफेडीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नव्या नियमांनुसार प्रवाशांनी तिकीट आरक्षण केल्यानंतर ४८ तासांच्या आत तिकीट रद्द केले किंवा त्यामध्ये बदल केला तर त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
नव्या नियमानुसार काही अटींच्या अधीन राहून प्रवाशांना आरक्षण केल्यानंतर दोन दिवसांच्या आत तिकीट बदलण्याची किंवा रद्द करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी तिकीट बदलताना किंवा रद्द करताना विमान कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
प्रवाशांच्या तक्रारी आणि वाढत्या विमान प्रवासाच्या पार्श्वभूमीवर अधिक पारदर्शक आणि ग्राहकहिताचे नियम लागू करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे प्रवाशांना प्रवासाच्या नियोजनात अधिक लवचिकता मिळणार असून तिकीट आरक्षणानंतर योजना बदलल्यास आर्थिक नुकसान टाळता येणार आहे.