मेघा इंजिनिअरिंग प्रकरणावर अधिवेशनात मौन ; रोहित पवारांचा बावनकुळेंवर थेट सवाल
नवी मुंबई l
मेघा इंजिनिअरिंग संदर्भातील कथित गैरव्यवहारांबाबत हिवाळी अधिवेशनात सविस्तर भूमिका मांडण्याचे जाहीर आश्वासन देऊनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण अधिवेशनात एक शब्दही न बोलल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत “मेघा इंजिनिअरिंगसंदर्भात एवढा पळ कशासाठी? हा बाँड कोणता?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, महसूल विभागातील अवैध उत्खननासंदर्भात, विशेषतः उलवे टेकडी उत्खनन आणि मेघा इंजिनिअरिंगशी संबंधित कथित बेकायदेशीर उत्खननाबाबत, विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागाने हे प्रश्न ना स्वीकारले, ना यावर उत्तर दिले. शिवाय, मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अधिवेशनात भूमिका मांडली नाही, असा आरोप त्यांनी केला.
पवार यांनी पुढे म्हटले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील विकासकामांशी संबंधित उत्खनन, पर्यावरणीय नियमांचे पालन, दंड/समायोजनाची रक्कम, तसेच कथित बाँडच्या अटी-शर्ती याबाबत स्पष्टता अपेक्षित होती. मात्र, या सर्व मुद्द्यांवर सरकारकडून मौन पाळले गेले.
या पार्श्वभूमीवर, “दिलेला शब्द मोडला गेला आहे,” असा आरोप करत रोहित पवार यांनी येत्या काळात या प्रकरणावर सविस्तर चर्चा व उत्तरांची मागणी कायम ठेवणार असल्याचे संकेत दिले आहे


