३२ तासांच्या कोंडीचा मोबदला
प्रवाशांना ५.१६ कोटींचा टोल परतावा
मुंबई l प्रतिनिधी
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील तब्बल ३२ तास चाललेल्या वाहतूक कोंडीप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मोठा निर्णय घेतला आहे. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या प्रकारामुळे सुमारे १.२ लाख प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर ५.१६ कोटी रुपयांचा टोल परतावा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
एमएसआरडीसीने टोल वसुली करणाऱ्या संबंधित कंपनीला फास्टॅगद्वारे वसूल झालेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे १ लाख वाहनचालकांच्या खात्यातून कपात झालेली जवळपास ५.२ कोटी रुपयांची रक्कम परत करण्यात येणार आहे.
ज्यांच्या फास्टॅग खात्यातून पैसे वजा झाले आहेत, त्यांच्या खात्यात ही रक्कम चालू आठवड्यात जमा केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एमएसआरडीसीने खेद व्यक्त केला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.


