मुंबई महापालिकेच्या निधी वाटपावरून वाद; विरोधकांना डावलल्याचा आरोप
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून खासदार आणि आमदारांना देण्यात येणाऱ्या विकास निधीच्या वाटपावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. २०२२ नंतर महापालिकेवर प्रशासक राजवट लागू झाल्यानंतर विविध विकास कामांसाठी निधी वितरित करण्यात आला. मात्र, या निधीपैकी केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदार-खासदारांनाच प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या तीन आर्थिक वर्षांपासून विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांना कोणताही निधी देण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संबंधित मतदारसंघांतील विकासकामे रखडत असून नागरिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. निधी वाटपात राजकारण करून विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेकडून सत्ताधारी आमदार-खासदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७३६ कोटी, २०२४-२५ मध्ये ३७८ कोटी आणि २०२५-२६ मध्ये ४८७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर निधी वाटप प्रक्रियेत पारदर्शकता आणून सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना समान संधी द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


