‘मित्रा’ आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांचा सामंजस्य करार
५६ लाख वृक्ष लागवडीसह पर्यावरणीय उपक्रमांना गती
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘जागतिक वसुंधरा दिन २०२६’ निमित्त हा करार करण्यात आला असून, राज्यातील हवामान कृतीला गती देण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
या कराराअंतर्गत ५६ लाख वृक्षांची लागवड हा प्रमुख उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच मिशन लाईफ, सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज, ‘आर्टिस्ट फॉर द अर्थ’ आणि मुंबईला ‘सस्टेनेबल इव्हेंट्स कॅपिटल’ बनविणे असे विविध उपक्रमही राबविले जाणार आहेत.
ही मोहीम महाराष्ट्र शासनाच्या ‘ग्रीनिंग महाराष्ट्र’ अभियानाचा एक भाग असून ३०० कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाशी जोडलेली आहे. या उपक्रमात केवळ वृक्ष लागवडीपुरते मर्यादित न राहता, झाडांचे जगण्याचे प्रमाण वाढविणे, त्यांची देखरेख आणि दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.


