रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे प्रस्तावित अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत अंमलबजावणीला अधिक गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देत असून, भगवती बंदर येथे उभारण्यात येणारे क्रूझ टर्मिनल हे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणच्या पर्यटन, व्यापार आणि रोजगारवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच रत्नागिरी आणि कोकणचा पर्यटन विकास अधिक वेगाने होऊन हा परिसर जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीसह इतर आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. प्रकल्पाची सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.