राज्यस्तरीय खरीप पीक स्पर्धा २०२६-२७; शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवून बक्षिसे जिंकण्याची संधी
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणीसह ११ पिकांचा समावेश; राज्यस्तरावर ५० हजारांपर्यंत बक्षीस
मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राज्यस्तरीय खरीप पीक स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्कृष्ट उत्पादनाला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देणे आणि स्पर्धात्मक शेतीला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना तालुका स्तरावर ५ हजार रुपयांपर्यंत, जिल्हा स्तरावर १० हजार रुपयांपर्यंत आणि राज्य स्तरावर ५० हजार रुपयांपर्यंत आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अर्जाची अंतिम मुदत
मूग आणि उडीद : १० ऑगस्ट २०२६
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल : ३१ ऑगस्ट २०२६
शेतकऱ्यांना या स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, महाराष्ट्र कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील ‘पीक स्पर्धा नोंदणी’ या टॅबद्वारे नोंदणी करता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधूनही अधिक माहिती घेता येणार आहे.
उत्कृष्ट उत्पादनाला योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी आणि शेतीतील कौशल्याला राज्यस्तरीय ओळख मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Tags:


