मुंबई, प्रतिनिधी : मुंबई शहरातील उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागांचा प्रभावी वापर करून त्या नागरिकांसाठी उपयुक्त बनविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या जागांवर उद्यान, जॉगिंग ट्रॅक, विरंगुळा केंद्रे तसेच हरित पट्टे विकसित करून शहराचे सौंदर्य वाढविण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस मुंबई महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात झालेल्या संयुक्त बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उड्डाणपुलांखालील जागांचे विद्रुपीकरण रोखून त्यांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपमहापौर संजय घाडी, विविध समित्यांचे अध्यक्ष, पालिका आयुक्त आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईकरांना स्वच्छ, सुंदर आणि जागतिक दर्जाचे शहर देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.