गव्याच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना वनविभागाकडून नुकसानभरपाई प्राप्त
चिपळूण l
गव्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या चिपळूण तालुक्यातील गुढे-जोगळेवाडी येथील रवींद्र पांडुरंग आग्रे यांच्या कुटुंबियांना वनविभागाकडून २५ लाख रुपये नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. रवींद्र आग्रे शेतीच्या कामासाठी जात असताना गुढे-मोरेवाडी स्मशानभूमीजवळ अचानक समोर आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामध्ये गव्याने त्यांच्या छातीत शिंग खुपसल्याने गंभीर जखमी होऊन यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी वनविभागाने जाऊन केलेल्या पंचनाम्यानुसार, गव्याचे केस, त्याच्या पाऊल खुणाही आढळल्या होत्या.
आग्रे यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यानेच झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानुसार नुकसान भरपाईच्या दृष्टीने वनविभागाने पुढील कार्यवाही सुरु केली होती. मात्र या कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई मिळावी, असा आग्रह पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे, विपुल कदम यांनी केला होता, अशी माहिती चिपळूण शिवसेना युवासेना तालुप्रमुख विक्रांत चव्हाण यांनी दिली.


