दाभोळ खाडीतील प्रदूषण व गाळ साचण्याच्या समस्येवर मंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक
दाभोळ खाडीतील प्रदूषण व गाळ साचण्याच्या समस्येवर मंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीमध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सातत्याने मासेमारीचे नुकसान होत असून मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात आढावा बैठक घेऊन संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी दाभोळ खाडीतील वाढते प्रदूषण, त्याचा मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम तसेच खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविणे आणि खाडीच्या मुखावरील गाळ काढण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
या बैठकीस माजी आमदार सूर्यकांत दळवी, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.