देवगड तालुक्यात नववर्षाची सुरुवात १३ समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमांनी !
देवगड – देवगड तालुक्यात नववर्षाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाच्या सकारात्मक कृतीसह करण्यात आली. ‘स्वच्छ किनारा, सुरक्षित पर्यावरण’ हा संदेश देत तालुक्यातील १३ समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमा यशस्वीरीत्या पार पडल्या. या मोहिमांचा उद्देश नववर्षाची सुरुवात सकारात्मक कृतीने करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता, असे देवगड गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आणि जिल्हा परिषद सिंधुदूर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून तसेच गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. तालुक्यातील १३ किनारपट्ट्यांवर स्थानिक नागरिक, युवक मंडळे, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला.
नववर्षाच्या सुरुवातीलाच ४०३ हून अधिक लोकांनी सहभाग घेत प्लास्टिक व अन्य कचरा एकत्र करून तब्बल ५०० किलो कचरा गोळा केला. यामुळे किनारे अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनले असून स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणाला हातभार लागला आहे. नागरिकांनी भविष्यातही अशा मोहिमांत सातत्याने सहभाग घेण्याचे आणि समुद्रकिनाऱ्यांवर कचरा न टाकण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


