नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी संसदेत जोरदार निदर्शने
नवी मुंबईl
संसद भवनाच्या आवारात बुधवार, १० डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील खासदारांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी तीव्र आणि जोरदार निदर्शने करण्यात आली.
खासदार बाळ्या मामा यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी एकत्र येत भूमिपुत्रांच्या सन्मानासाठी ठाम आवाज उठवला.
या आंदोलनादरम्यान खासदारांनी स्पष्ट केले की, नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामासाठी हजारो स्थानिकांनी जमीन दिली, नोकऱ्या आणि पुनर्वसनाचे आश्वासन मान्य केले, त्याग केला—त्यामुळे या विमानतळाला मूळ भूमिपुत्रांचे नेते व जननायक दि. बा. पाटील यांचे नाव देणे हा न्याय व सन्मानाचा प्रश्न आहे.
खासदार बाळ्या मामा म्हणाले,
“भूमिपुत्रांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा हा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आम्ही शांततेने पण ठामपणे केंद्र सरकारसमोर आमची भूमिका मांडत आहोत. आजच्या निदर्शनांतून पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट केले की ही मागणी केवळ राजकीय नाही, तर भावनिक आणि ऐतिहासिक न्यायाशी जोडलेली आहे.”
संसद भवनातील या निदर्शनांमुळे या मुद्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त झाले असून, पुढील काही दिवसांत या विषयावर केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


