नागरिकांच्या प्रशासकीय अडचणींसाठी अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहणार
नागरिकांच्या प्रशासकीय अडचणींसाठी अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहणार
दुपारी ३ ते ५ अभ्यागतांसाठी निश्चित वेळ
मुंबई :
नागरिकांना त्यांच्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि विविध कामांसाठी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता यावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी आपल्या कार्यालयात दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहावे, असा शासन निर्णय ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अभ्यागतांसाठी दुपारी ३ ते ५ ही निश्चित वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांना आपल्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी तसेच विविध शासकीय कामांबाबत अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली बाजू मांडता येणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थेट संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.