सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत राडा; पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण आणि धक्काबुकीच्या प्रकाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सरकारला दिले आहेत.
या घटनेत मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मंत्री शंभूराजे देसाई यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित सुमारे १०० पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंत्र्यांच्या सुरक्षेबाबतच जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


