सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी मिशन मोडवर काम करण्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांचे निर्देश
नागपूर l
राज्याला सिकलसेलमुक्त करण्यासाठी तत्काळ आणि मिशन मोडवर काम करा, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले. सिकलसेल नियंत्रणासाठी घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी “एकही रुग्ण नोंदणीविना राहू नये” असा कडक आदेश दिला.
सिकलसेल रुग्णसंख्या ‘शून्यावर’ आणण्यासाठी रुग्णांची अचूक ओळख सर्वात महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण व आदिवासी भागात तपासण्या जलदगतीने करून सापडणाऱ्या रुग्णांना तात्काळ ओळखपत्र देण्याचे त्यांनी निर्देश दिले.
खाजगी संस्थांवर अवलंबून न राहता सर्व ग्रामीण रुग्णालयांत सिकलसेल तपासणीची स्वतःची यंत्रणा, तांत्रिक मनुष्यबळ, ब्लड स्टोरेज आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक कार्यक्रमांना गती देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी आदिवासी भागात स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्यास रोटेशन पद्धतीने इतर भागातील तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती अनिवार्य करण्याचे आदेश दिले.
नागपूर येथील आरोग्य सेवा कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, रामदास मसराम, केवलराम काळे, हरिश्चंद्र भोये, आमश्या पाडवी, राजेश पाडवी, मंजुळा गावित, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोल्हाईत, तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी पातळीवरील आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते.


